विद्याभारती संचालित श्री शांता विद्यालयाच्या शालांत विद्यार्थ्यांचा भावमधुर निरोप समारंभ : स्वर, संस्कार आणि स्नेहाचा सुवर्णमेळ
शांता विद्यालय या विद्येच्या पवित्र मंदिरात उज्ज्वल भविष्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला समारंभ हा भावनांचा, कृतज्ञतेचा आणि प्रेरणेचा अविस्मरणीय सोहळा ठरला. या मंगलप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे व्यवस्थापक श्री पुरुषोत्तम कामत, प्राथमिक विभागाचे व्यवस्थापक श्री कमलकांत वायंगणकर तसेच पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा सौ .रेशमा लंगोटे यांची उपस्थिती लाभली. यांच्यासह मुख्याध्यापक श्री विश्वास सांगाळे, वरिष्ठ शिक्षक श्री नवनाथ सावंत, शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी व
विद्यार्थी गण यांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिकच दिमाखदार झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली आणि स्वागतगीताच्या सुरेल लयींनी वातावरण मंगलमय झाले. या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु.युतिका सांगाळे हिने अत्यंत ओजस्वी आणि देखण्या शैलीत केले.
प्रास्ताविक व परिचयपर शब्दांमधून मान्यवरांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यानंतर वर्गशिक्षक श्री .नवनाथ सावंत आणि शिक्षक श्री .उमेश महालकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील आठवणींचा ओलावा व्यक्त केला—मैत्रीचे रंग, शिक्षकांचे प्रेमळ मार्गदर्शन आणि शालेय जीवनातील प्रत्येक क्षण त्यांनी शब्दरूपात जिवंत केला.
या प्रसंगी मान्यवरांनीही आपल्या विचारांतून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. श्री पुरुषोत्तम कामत यांनी शिक्षण ही केवळ गुणांची शर्यत नसून जीवन घडवणारी शक्ती आहे असे सांगत, प्रामाणिकपणा, शिस्त आणि अथक परिश्रम यांच्या बळावर जीवनातील प्रत्येक आव्हान पेलण्याचे धैर्य विद्यार्थ्यांनी ठेवावे, असे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी चिकाटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
तसेच श्री कमलकांत वायंगणकर यांनी आपल्या ओघवत्या शब्दांत जीवनातील यशासोबत नम्रतेचे महत्त्व अधोरेखित केले. कितीही उंच भरारी घेतली तरी आपल्या संस्कारांची मुळे घट्ट ठेवावीत, माणुसकी आणि साधेपणा हीच खरी ओळख असावी, असा संदेश त्यांनी दिला.
श्रीमती रेश्मा लंगोटे यांनी मातेसमान भावनेतून विद्यार्थ्यांना आशीर्वाद देताना, आत्मविश्वास आणि मेहनत यांची जोड असेल तर कोणतेही ध्येय अशक्य राहत नाही, असे सांगितले. पालक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा आदर ठेवत जीवनात पुढे जाण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
मुख्याध्यापक श्री विश्वास सांगळे यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा व दृढनिश्चय यांचे महत्त्व पटवून दिले, तर शिक्षक श्री संगम चौरंग यांनी गुरु-शिष्य नात्याची सुंदर उकल करत प्रेरणा दिली.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी मनोरंजन खेळांचे आयोजन करण्यात आले विजेत्यांना बक्षीसे प्रदान करण्यात आली आणि सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. या स्नेहमेळाव्यात आनंद, संवाद आणि आठवणींचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
शेवटी विद्यार्थ्यांपैकी अरविंद सिंग यांनी आभार प्रदर्शन करत उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आणि कार्यक्रमाची सुंदर सांगता झाली.
हा निरोप समारंभ केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर तो आठवणींचा खजिना, संस्कारांची शिदोरी आणि नव्या स्वप्नांच्या दिशेने टाकलेले आत्मविश्वासपूर्ण पहिले पाऊल ठरला.
|
|
विद्याभारती संचालित श्री शांता विद्यालयाच्या शालांत विद्यार्थ्यांचा भावमधुर निरोप समारंभ : स्वर, संस्कार आणि स्नेहाचा सुवर्णमेळ
Advertisement






